Tuesday, February 02, 2010

अपघात

अपघात! पेपर मध्ये वारंवार येणार्,‍या अगदी क्षुल्लकशा अपघाताने जीव गमावावा लागलेल्या कितीतरी घटना. आजही एका कोवळ्या चिमुकल्या कळी ला नाहक जीव गमवावा लागला.
मुलाला क्लास ला सायकलने पाठवायचे म्हटले की पोटात गोळा येतो. तो हट्ट करत राहतो...की सगळेच येतात, मला पण जाऊदे....एकीकडे मूल बावळट, भित्रं होऊ नये, धीट व्हावं हीही इच्छा असते, पण मन धजावत नाही...पौड रोड वरचा वाहता , बेबंद ट्रॅफिक, उखणलेले रस्ते, उंच सखल झालेलं अर्धवट रस्त्याचं काम, भाजीवाले, गर्दी, सिग्नल नसल्याने वनाज़ कडून यॆणारे सुसाट दुचाकी स्वार....एकदा काही वाईट घटना घडली तर मग दोषारोप करण्यात काहीच अर्थ नसतो!

Tuesday, January 27, 2009

प्रयत्न!

नुकतीच एक दिलासादाय़ी बातमी वाचनात आली. ती अशी की, अमेरिकेत स्थायीक झालेल्या भारतीयांनी मिळून एक “दबाव गट” , (टास्क फ़ोर्स ) स्थापन केला आहे, आणि त्यांचे सुमारे १५० जणांचे प्रतिनिधी मंडळ आज ओबामा यांना भेटून पाकिस्तान वर कारवाई करणे कसे गरजेचे आहे, त्याचा सगळ्यांना कसा फायदा होईल हे सांगणार आहे.
त्यायोगे अमेरिकेकडून पाकिस्तानवर अधिक दबाव येऊ शकेल.

आजच्या परिस्थितीत ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण पाकिस्तान वर डायरेक्ट हल्ला करु शकत नाही आणि राजनैतीक कौशल्यानेच ही परिस्थिती हाताळावयास हवी. अमेरिकेकडूनच पाकचा परस्पर काटा काढणे जरुरी आहे.

अमेरिकास्थित भारतीयांना आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची ही सुसंधी आहे. भारतमातेचे सुपुत्र बाहेर राहूनही तिच्या हितासाठी, रक्षणासाठी पाऊल उचलत आहेत हे वाचून मन आनंदित झाले.
त्यांना या इनिशिएटिव्ह साठी आणि पुढिल फॉलो अप साठी अनेक शुभेच्छा.

आपल्या ब्लॉग मित्रांपैकी कुणी आहे का या कृती समितीत?

याचा कितपत फायदा होईल ही पुढची गोष्ट आहे, कारण अमेरिकेला भारताच्या हितात फारसे स्वारस्य नाही, पण पहिले पाऊल महत्वाचे असते....त्यानेच तर पुढचा मार्ग चालायला सुरुवात होते.

Wednesday, December 03, 2008

दहशतवाद

मुंबईत झालेल्या बेछूट हल्ल्यामुळे मन सुन्न झाले आहे. काही विचार सुचत नाही! इतके आपण अगतीक का आहोत?

दहशत वादाचा मुकाबला करण्या साठी स्वतंत्र खाते (मिनीस्ट्री) स्थापन करायला हवे. त्यांचे काम फक्त एकच..देशांतर्गत सुरक्षितता ! गृह मंत्रालयाला या जबाबदारीतून मुक्त करावे. महत्वाच्या शहरांमध्ये त्यांची दले तैनात असतील.
नैसर्गिक आपत्ती, पूर, दंगे, सभा, इतर अपघात...यांत गृह खात्याला काम करू द्यावे...पण जेव्हाही दहशत वादाचा प्रश्न येईल तेव्हा हाय ऍलर्ट ठेवून बाकी कुणालाही मध्ये न घेता एकदम पद्धतशीर, प्रशिक्षण देऊन कारवाई करावी. सीमा सुरक्षा दल आणि मिलीट्री हे या खात्यासोबत संलग्न असतील. त्याचा मंत्री हा पारंपारीक निवडणूकीतून न ठरता एखादा वरीष्ठ पोलीस अधिकारी वा एक्सपर्ट व्यक्ती असेल.
त्यांना सर्वोच्च प्राधान्य आणि अधिकार असतील.
फोकस्ड ऍप्रोच आणि नियोजन यानेच दहशत वादाचा मुकाबला करणे शक्य आहे. सरकारे काही करु शकत नाहीत.

Tuesday, November 11, 2008

राजस्थान

प्रशस्त, लांबवर पसरलेले पॅसेजेस, दुतर्फा लटकविलेली राजांची , राण्यांची चित्रं, वंशावळी, प्रसंग…मोठाली दालनं...आणि न संपणारा बहादुरीचा इतिहास....
पन्ना दाईने केलेला त्याग आणि वाचविलेला एकमेव वंशज..
उत्कट मीरा, तिची आजही जाणविणारी कृष्णप्रीत……..
राणा प्रताप…त्याचा प्रिय घोडा चेतक, पद्मिनीचे असामान्य सौंदर्य…त्यापायी घडलेल्या लढाया आणि सांडलले रक्त, केलेले स्वाभिमानी जोहार, ……….
उदयपूर हा अनमोल ठेवा वाटत राहतो.

मोठे मोठे किल्ले, वाडे, पॅलेस, हवेल्या….त्यातून उलगडत जाणारी जुन्य़ा ऐश्वर्य संपन्न इतिहासाची झलक, अगदी नियोजीत शहर वाटावे असे विस्तीर्ण प्राकार, महाल, खेळविलेले पाणी, जनानाखाना…राजवैभवी सभामंडप, अस्त्रं शस्त्रं, भोजनगृहे, एका रांगेतली गुलाबी घरं ………....
वीर योद्धे आणि त्यांच्या कथा...लखलखता शीश महाल, शाही जलमहाल……………………………………
जयपूरचे सौंदर्यवर्णन संपता संपत नाही

वाळवंटातील अवर्णनीय जादू, मन भारून टाकणार्‍या प्रेम कहाण्या, केसरीया बालमा……… ची अवीट सुरावट….अपरिचीत शब्द आणि ओळखीची धून, अनिवार्य पणे होणारी “लेकिन” आणि हृदयनाथ च्या संगीताची आठवण...सूर तर दूर दूर पर्यंत पसरलेल्या वाळूत रेंगाळलेले अजून….मनही तिथेच थांबून राहिलेलं…घेरदार घागर्‍याच्या रंगीत आरशांमध्ये ..

तंतुवाद्याची रुणझुणती साद, नक्षीदार पायर्‍या उतरणारी पावलं, त्या वैभवाने अचंबित झालेलं मन, सदैव पडद्याआड रहावं लागणार्‍या लावण्यवती राजस्थानी ललनांपेक्षा महाराष्ट्रीयन स्त्रिया कितीतरी पुढे असल्याचा दाटून आलेला अभिमान.
राजपुत वीर….त्यांची बहादुरी, शौर्य, प्रेम, भक्ती, समृद्धी… डोळे दिपविणारी कलाकुसर, चित्रकला, कोरीव काम, कपडे…. इर्षा, दुष्मनी, व्यापार…………………….

हळदी रंगाच्या दगडावर कोरलेली अप्रतीम शिल्पं..............उधाणलेला वारा आणि बारीक उडणारी मुलायम वाळू..
तहान तहान झालेला कंठ आणि बोअर चं खारं पाणी....
पिवळ्या धुळीत वेढून राहीलेलं सुवर्ण शहर जैसलमेर विसरणं शक्य नाही.

राजस्थानच्या हाकेला "ओ" देऊन एकदा हे सारं अनुभवायला हवं.

Friday, October 24, 2008

दिवाळीच्या शुभेच्छा!

मित्रांनो

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा!
ही दिवाळी आणि नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, नवनवीन प्रतिभेच्या उन्मेषांचे, कृतिशील विचारांचे आणि प्रेरणेचे जावो!



अश्विनी.............

Wednesday, July 02, 2008

कंचनीचा महाल

तोच तो इच्छित दीपक दिसला काठाशी हासत आले
क्षितीजा पासून क्षितीजा पर्यंत आकाश कंपीत झाले
अहंते वर या ओवाळले रे मी पाचही हे प्राण माझे
भरून छातीत नेत्रांत धावले उन्मत्त उधाण माझे
ताठर नाचत होता रे माझ्या या भुवयां वरती माज
माथीचा चंद्रही बघत होता हा बुडून गेलेली सांज
तोच ती आली रे हाक त्या पोराची उभार ते हात होते
दाबून घट्ट हे अधर तरी मी समोर पहात होते
आतले कठीण्य तनूत आले रे तोच अन झाले मी काळी
कठीण पणा हा गोठून पडले दगड बनून खाली


माझ्या या महाला मधल्या प्रत्येक कमानी कमानी पुढे
वार्‍याच्या झुळूकी वरुन आत्ताच वाजत गेले रे चुडे
प्रत्येक रंगीत हातात होती रे उज्ज्वल दीपाची थाळी
प्रत्येक कपाळी शोभत होती रे मोत्यांची सुंदर जाळी
तुपाचे दीपक जाळून होता मी चांदवा धूसर केला
जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

खालच्या मैदानावर मी रात्रीत दुरात ऐकते टापा
ऐकते तमात एकाकी गुराच्या या भिंती जवळ धापा
कमानी कमानी मधून सारखा हुंकार देतात वारे
पाहत जातात भकास निळ्या या आकाशा मधले तारे
आतून लागते आच पण हा दगड पेटत नाही
सगळे पारखे दयेचे मायेचे कुणीच भेटत नाही
अंधार्‍या रात्रीत ती सारी नगरी तमात बुडते बाई!
मिटल्या दातांच्या ओसाड भिंती या बोलत नाहीत काही
पुनव येताच वासनामय मी दगडा मधून येते
महाला भोवती चांदण्या खालती तेच ते फेर मी घेते

कशी रे रंगवू आज मी राजसा ते चित्र पुसट लेले
पुनव रात्रीत माझे हे हिंडते मानस विस्कटलेले
दक्षिण दाराच्या बाहेर पडले अनेक शतके अशी
पाषाण मय हे अचल जिवीत सोशीत आहे मी पिशी
पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !



समाप्त!


(ना घ देशपांडे या कविवर्यांविषयी अधिक माहिती मिळेल का?
इतके उत्कृष्ट लिखाण / काव्य करणारा कवि अंमळ दुर्लक्षित राहीला असे वाटते. कुणी यावर काही सांगू शकेल काय?)

इतकी दीर्घ कविता वाचाण्याचा पेशंन्स ठेवल्याबद्दल वाचकांचेही आभार

Tuesday, July 01, 2008

कंचनीचा महाल

अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा प्रकाश थर
रंगीत ज्योतींचे दीपक होते या कंगणी कंगणी वर

मौनाचे मोहन घालून थांबला एकच निमीष वारा
झंकार करत उअठल्या नंतर वीणेच्या कोमल तारा
इतर गणिका नाचल्या भोवती एकेक मोहक होती
झळक देवून हालले तालात सांजांचे माणिक मोती
वाजले मॄदंग वाजल्या तालिका प्रत्येक राजस बाळी
नाचत मंडला कारात डौलात तालात तन्मय झाली.
अनेक आरत्यां मधून फाकला तुपाचा सुगंधी धूर
सगळ्यांवरती चढला आगळा कोवळा माझाच सूर
कंकण कंचुकी मंडित दावित सुगौर सरळ भुजा
आरती ठेवून उठले शेवटी करून प्रदोष- पूजा

फिकट झाले रे चांदणे नंतर थांबले आवाज सारे
विझली समई थांबली सनई थांबले सुगंधी वारे
विषण्ण होऊन निघून गेले रे सगळे दांभिक थोर
सगळे जाऊन उरला विशीचा एकच राजस पोर
बोलला हळूच “चढण उतार नंतर नीलार्द्र हवा
संगती जाऊन लोणार तळ्यात बघूया देवीचा दिवा”
“बांधून महाल येथून पाहीन एकटा परत जा तू
परत जा रे तू कुठल्या दूरच्या राजाचा पुत्र वा नातू”
सगळे कळत होते रे नव्हते माझे हे मानस भोळे
बगह्त राहीले मी एकसारखी त्याचे ते लाचार डोळे

फासात फसल्या सावजा वरला होते रे मी एक भाला
सगळी ह्रूदये जाळीत जाणारी होते रे मी एक ज्वाला
कसले गायन माझे ते नुसते अधर कूजीत होते
मांडून देवता माझीच अहंता सारखी पूजीत होते.
नुसते नेटके नाटक होते ते नव्हते मनात कढ
हिअवात जाळीत होते मी कोवळे हिरवे केळीचे फड
अशा या येथून दूरात गेल्या रे विषण्ण सुदीर्घ धापा
समोर पूर्वेच्या या माळावरून विरल्या घोड्यांच्या टापा
लहान लहान होऊन शेवटी बनून एकत्र जाळॆ
क्षितीजा वरल्या प्रकाश कडेत विरले आकार काळे

प्रीतीच्या दानाची कधीच नव्हती केली मी किंचीत फेड
नुसते होते रे मोहीत मानव ह्रूदय हत्येचे वेड
दूरात खोलात तमात लवली व्यथित ही वृक्ष राजी
जिंकत जिंकत हासत नाचली निर्दय अहंता माझी
दक्षिण बाजूच्या गोलार्ध भूमीच्या पल्याड आभाळाखाली
निजली नगरी मिटून नयने ओढून ओढणी काळी
प्रत्येक प्रदोष पूजेला आला तो लाचार अनेकवेळ
प्रत्येक वेळी मी निर्दय मांडीला तोच तो तोच तो खेळ
अनेक दिवस तीच ती याचना डोळ्यांत आणून पाणी
कोरडी राहीले कोरडी हासत मी गीत गंधाची राणी

महाला वर या बांधीत मजले ही वर कंचनी गेली
तहान भूकेची मायेची प्रीतीची नव्हती कदर केली
मूळात होते हे दोनच मजले आणखी बांधले पाच
अनेक ज्योतींच्या भोवती झुलले झुंबरा मधले काच
वाटले होते की उंचात जाऊन तार्‍यांत करीन वेचा
वाटले होते की तेथून पाहीन दीपक कमल जेचा
सप्तर्षीं समोर मी अंग विक्षेप करीत जाईन नीट
मी सप्त सुरांत गाईन नितांत सुंदर स्वर्गीय गीत
चढले मजले सहाही पण तो दीपक दिसला नाही
चढले सातवा आणिक पाहीले दक्षिण दिशेस बाई!


क्रमशः